Sunday, July 23, 2023

काय बाई सांगू



काय बाई सांगू 
कसं ग सांगू 
मलाच माझी वाटे लाज 
काहीतरी होऊन गेलंय आज 

आपली आपल्यालाच लाज वाटावी अशी परिस्थिती आहे. जे राजकीय नेते आपल्या नशिबी आलेत त्याला आपणच जबाबदार आहोत असं वाटू लागलंय. राजकारणाच्या घसरलेल्या दर्जाचं समर्थन करण्यासाठी हे नेते आणि त्यांचे मित्र -पत्रकार वारंवार एका वाक्याची मदत घेतात आणि आपण त्यांना ते करू देतो.    

ते वाक्य म्हणजे, "Everything is fair in love, war and politics". प्रेम, युद्ध आणि राजकारण ह्यात म्हणे सगळं माफ असतं. 

कोणीच त्यांना कधी विचारलं नाही कि खरंच सगळं माफ असतं का? तुम्हांला हे कोणी सांगितलं?  

वरील वाक्य आपल्याला वेगवेगळ्या लोकांनी इतक्या वेळा ऐकवलं आहे कि केवळ पुन्हा पुन्हा ऐकल्यामुळे लोक त्यावर विश्वास ठेऊ लागलेत. हे वाक्य कुठुन आलं, कुठल्या संदर्भात कोणी ते पहिल्यांदा म्हंटलं हे पडताळुन पहाण्याची गरज कोणालाच वाटत नाही. ते वाक्य ऐकणाऱ्यांना त्याची शहानिशा करावीशी वाटत नाही आणि ते सर्वसामान्य लोकांच्या तोंडावर फेकणाऱ्या तथाकथित "नि:पक्षपाती" वाक्-पंडितांना किंवा आपल्या बेताल वागण्याचं समर्थन करू पहाणाऱ्या राजकारणी लोकांनाही त्याची गरज भासत नाही.  

फार लांब जाण्याची गरज नाही. ग्रंथालयात बसुन गहन संशोधनही करायला नको. आपल्या हातातल्या फोनवर थोडंसं शोधलं तर दिसेल की मुळ वाक्य "एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर " एवढंच आहे. त्यात "राजकारण" हा शब्द संधीसाधू राजकारणी लोकांनी आपल्या चुकीच्या वागण्याचं निर्लज्ज समर्थन करण्यासाठी घुसडलेला असावा. 

जॉन लीली या कवीच्या १५७९ साली प्रकाशित झालेल्या युफ्युईस - द ऍनाटमी ऑफ वीट्ट (Euphues - The Anatomy of Wit) या कादंबरीतील एका पात्राच्या तोंडचं हे वाक्य आहे. त्या कादंबरीत एका श्रीमंत, आकर्षक तरुणाच्या "रोमँटिक ऍडव्हेंचर्सचं" वर्णन आहे. कादंबरीत म्हंटलंय "the rules of fair play do not apply in love and war". 

देखणे श्रीमंत तरुण किती बिघडलेले - spoilt brats - असु शकतात याचं चित्रण आपण अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटातुन बघितलेलं आहे आणि याची उदाहरणं खऱ्या आयुष्यातही पाहिली आहेत. वरील कादंबरीतील तरुण वाया गेलेला आहे कि नाही माहीत नाही पण स्वतःच्या अनिर्बंध वागण्याचं समर्थन करणारा बालिश आणि स्वार्थी मुलगा असु शकतो. अशा व्यक्तिरेखेच्या संदर्भातील वाक्य घेऊन ते सर्वसामान्य लोकांच्या तोंडावर फेकण्याचं काम महत्वाच्या पदावर बसणाऱ्या अनेक बेजबाबदार लोकांनी आजवर केलं आहे. 

हा आयता पाठिंबा मिळाल्या मुळेच कदाचित वर्षानुवर्षे अनेक प्रियकर आपल्या प्रेयसींवर अत्याचार करायला धजावले आहेत:
"माझं तिच्यावर प्रेम आहे पण तिनं मला झिडकारलं म्हणून मी तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं". 
"माझं तिच्यावर खूप प्रेम आहे म्हणून मी तिच्या शरीराचे बारीक बारीक तुकडे केले". 
"माझं तिच्यावर प्रेम आहे पण ती मला सोडून गेली म्हणून ती ज्या पार्लर मध्ये काम करते त्या पार्लरला मी आग लावली. त्यात ती जळुन मेली यात माझा काय दोष." 
हे सगळं प्रेमात माफ असतं? 

आजच्या काळात युद्धातही सगळं माफ नसतं. युद्धाचेही आंतरराष्ट्रीय नियम आहेत ते पाळावे लगतात. त्या विरुद्ध वागलं तर त्याची गणना वॉर क्राईम्स मध्ये होते. 

राजकारणी लोक जेंव्हा युद्ध आणि राजकारणाला एका ओळीत बसवतात तेंव्हा ते स्वतःला आणि जनतेला फसवु पहात असतात कि ते सत्ता आणि त्यापासुन मिळणाऱ्या फायद्यांना हपापले भ्रष्ट राजकारणी नाहीत तर समाज रक्षणार्थ लढणारे वीर योद्धे आहेत. लोकांच्या आणि स्वतःच्या नजरेत रसातळाला गेलेली स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा तो केविलवाणा प्रयत्न असतो आणि देशासाठी प्राणपणाला लावून लढणाऱ्या आणि प्रसंगी धारातीर्थी पडणाऱ्या खऱ्या  योद्धयांचा धडधडीत अपमान.    

राजकारण म्हणजे युद्ध नाही. तो रणसंग्राम नक्कीच नाही. युद्धात प्राणहानी आणि विध्वंस गृहीत धरला जातो. राजकारणात तसं गृहीत धरण्याची काही गरज नसते. समाजात शांतता आणि सुव्यवस्था नांदावी, त्या शांततेच्या वातावरणात लोकांचा सर्वागीण विकास आणि प्रगती व्हावी, त्यांचं रहाणीमान सहज सोप्प व्हावं आणि हे घडवून आणण्यासाठी योग्य ते लोक निवडता यावेत याची प्रक्रिया म्हणजे राजकारण. सत्तापिपासू संधीसाधू लोक त्या प्रक्रियेचं रस्सीखेचेत रूपांतर करतात आणि तो एक खेळ असल्या प्रमाणे प्रेक्षक बघत बसतात.  

सगळ्या बघ्यांनी खरतर एक प्रश्न विचारायला हवा जो कोणी विचारत नाही -  कि खेळ रस्सीखेचेचा असला तरी त्याचे काही नियम आहेत का? दुसऱ्या बाजूच्या लोकांना आपल्याकडे खेचुन घेणं हा या खेळाचा उद्देश असला तरी कुठ्ल्याही अवैध मार्गानी ते केलं तर चालतं का?  म्हणजेच Do ends justify the means? 

'१९च्या निवडणुकीत आमची फसवणूक करण्यात आली त्याचा बदला घेणं हा आमचा राजकीय हक्क आहे हे वाक्य जर लोकांना ऐकवण्यात येत असेल तर तो बदला कुठल्या मार्गानी घेतला जावा याचे काही नियम आहेत की नाही हे लोकांनी विचारायला हवं.  

'१९ च्या निवडणुकीची फार मोठी गम्मत होऊन बसली आहे. जसं एखादं पुस्तक किंवा कविता एकदा वाचून समजली नाही तर दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा वाचताना तिचा अर्थ आपल्या समोर उलगडत जातो. तीच गोष्ट चित्रपटालाही लागू होते. एखादा चित्रपट पहिल्यांदा बघताना नीटसा समजला नसेल तर दुसऱ्यांदा बघितल्यावर कथानकाचा आधी न समजलेला भाग जास्त स्पष्ट होतो. 

'१९ च्या निवडणुकीचही तेच झालंय. त्या निवडणुकीची जितक्या वेळा उजळणी होतेय तितक्या वेळा तिचे विविध पैलू- जे तेंव्हा लक्षात आले नव्हते ते नव्याने दिसु लागलेत. त्यामुळे अर्थातच काही प्रश्न उभे रहातात. त्या निवडणुकीचं नाट्य संपल्या नंतर जनतेला अंधारात ठेऊन आपले निर्णय त्यांच्यावर लादण्याच काम सलग तीन वेळा कुठल्या राजकीय पक्षानी केलं? वागणुकीचा हा पॅटर्न कुठल्या पक्षात दिसुन येतो?

मग तो अवेळी झालेला शपथ विधी असो; रात्रीच्या अंधारात आमदारांना पळवून नेऊन त्यांना दुसऱ्या राज्यात लपवून ठेवणं असो; किंवा अगदी कालपरवा झालेली त्रिशंकु सरकारची सुरवात असो.  

अरे बापरे, "त्रिशंकु सरकार"? हा शब्द प्रयोग कुठुन आला? कोणी तो शब्द कुठल्या सरकारच्या बाबतीत पहिल्यांदा वापरला? मी नाही बाबा त्याची सुरवात केली. आपल्याला नाही माहीत कोणी तो पहिल्यांदा वापरला. यु ट्यूबवर शोधलं तर सापडेल कदाचित. पण कशाला उगीच आपला बहुमुल्य वेळ त्यात वाया घालवा. 

कारण, मुद्दा तो नाही. "त्रिशंकु सरकार" हा शब्द कोणी कुठल्या सरकारच्या बाबतीत पहिल्यांदा वापरला हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे कि लपूनछपून सरकार बदलाचे कट रचायचे, त्याबद्दल सर्वसामान्य जनतेला सर्वतोपरीने अंधारात ठेऊन आपले निर्णय त्यांच्यावर लादायचे हा पॅटर्न कुठल्या पक्षाच्या वागण्यात दिसुन येतो. ज्यांनी ते '१९ च्या निवडणुकी नंतर लागोपाठ तीन वेळा केलं त्त्याच पक्षानी ते त्या निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा केलं असेल अशी दाट शक्यता नाही का वाटत? 

राज्यातील जनतेला धक्का देण्याचं राजकारण करण्याची सवय जडलेल्या नेत्यांकडुन परिपक्वतेची अपेक्षा करणं मूर्खपणा ठरेल. परंतु या नेत्यांच्या अपरिपक्वतेमुळे, ते आणि त्यांच्या समर्थकांपासुन राज्याला काही धोका पोहचू शकतो का हे बघणंही खूप आवश्यक आहे. राज्यातील एकता - एकात्मतेत त्यांच्यामुळे बाधा येऊ शकते का यावर लक्ष ठेवायला हवं. राज्यात धार्मिक तेढ सोडून द्या, जातींमध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि लोकशाही सुधृढ रहावी म्हणून हे करणं गरजेचं आहे. 

राजकीय नेते काय बोलतात ते ऐकलं तर असं दिसतं कि क्रिकेट हा देशात सर्वात लोकप्रिय खेळ असल्यामुळे राजकारणाची रस्सीखेच खेळताना ते क्रिकेटची शब्दावली त्यामध्ये घुसवतात. "मी गुगली टाकला", "तो क्लीन बोल्ड झाला" अशी वाक्य मग लोकांना ऐकायला मिळतात. तिसऱ्याला वाटतं आपण एखादा शब्द घुसडला नाही तर क्रिकेटच्या बाबतीत आपण अडाणी आहोत असं वाटेल. म्हणून तो उगीचच म्हणतो "यॉर्कर". पोरकटपणा, पोरखेळ, पोरसवजा असे पोर ने सुरु होणारे शब्द न वापरता या वागण्याचं वर्णन करणं अशक्य आहे. त्यांच्या खेळात राज्याचा खेळखंडोबा होतो याबद्दल त्यांना ना खंत वाटते ना खेद. 

"पॉलिटिक्स ऑफ शॉक" चा वारंवार वापर करू पहाणाऱ्या नेत्यांना लगाम घालणं हे राज्यात रहाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. खास करून महिलांचं. नव्याने सुरु झालेल्या त्रिशंकु सरकार मध्ये ज्या आठ मंत्र्यांची वर्णी लावण्यात आली आहे त्यात एक पेक्षा जास्त महिलेचा समावेश नाही या बद्दल महिलांनी तक्रार केली नाही तर दुसरं कोण करेल. 

परंतु त्यासाठी "राजकारण हा आपला प्रांत नाही" हे जुने संस्कार विसरावे लागतील. जे काय चाललंय ते नीट समजुन घ्यावं लागेल. पुरुष मंडळी आपसात खेळत असलेल्या रस्सीखेचे वर रोखुन नजर ठेवावी लागेलं. 

जरी लाजरी झाले धीट 
बघत राहिले त्यांना नीट 
कुळवंताची पोर जरी मी 
विसरून गेले रितरीवाज 

कारण काहीतरी होऊन गेलंय आज. 


 





Wednesday, March 8, 2023

काल्पनिक मुलाखत


जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका खास व्यक्तीची मुलाखत घ्यावी अशी खूप इच्छा होती. अशी व्यक्ती जी अनेक पुरस्कारांची मानकरी होण्याच्या योग्यतेची आहे -  आदर्श सून, आदर्श पत्नी आणि आदर्श आई आहे. तसेच देशातील पहिल्या दोनतीन राजकीय नेत्यांमध्ये त्या व्यक्तीला स्थान आहे. 

त्यांच्या आयुष्याबद्दल खूप कुतुहुल होतं. एक मुळ महत्वाचा प्रश्न होता ज्याचं उत्तर दुसरं कोणी देऊ शकणार नाही असं वाटलं. 

तो प्रश्न काल्पनिक मुलाखतीत विचारण्याची संधी मिळाली:  

ज्ञानी लोक असं म्हणतात कि आपल्या आयुष्यात जे काही घडतं त्यावर आपलं नियंत्रण फार कमी असतं. हे विधान जितकं तुमच्या बाबतीत खरं ठरलं आहे तितकं क्वचितच दुसऱ्या कोणाच्या बाबतीत खरं ठरंत असेल.  

तुम्ही सुखी संसारात स्थिरावलेल्या असताना एक दिवस तुमच्या सासुबाईंची अतिरेक्यांनी निर्घृण हत्या केली. त्या नंतर काही वर्षांनी तुमच्या पतींची हत्या झाली. या दोन्ही हत्या दोन वेगवेगळ्या देशातील विघटन वादी चळवळी मुळे झाल्या. इंदिराजींची हत्या त्यांनी खालिस्तान चळवळ संपुष्टात आणण्यासाठी जी कारवाई केली त्यामुळे झाली तर राजीव गांधींची हत्या श्रीलंकेतील तामिळ सेपरेटिस्ट चळवळी मुळे झाली.   

या दोन चळवळींचा तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम होण्याचं खरतर काही कारण नव्हतं. कुठले कोण हे दोन आशियायी देश. तुम्ही युरोपियन. तुम्हाला राजकारणाची पार्श्वभूमी नाही. राजीव गांधीं बरोबर लग्न करून तुम्ही भारतात आलात. त्यावेळी भविष्य काळात कधीतरी इथल्या राजकारणात भाग घ्यावा ही तुमची महत्वाकांक्षा असण शक्य नव्हतं. 

पण या दोन हत्त्यांमुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली आणि गेली जवळपास तीस वर्ष तुम्हांला भारताच्या राजकारणात सक्रीय भाग घ्यावा लागला. आपण या सगळ्याकडे कसं बघता?  

                                                                                          

                                                                                               ******


खूप मिनतवारी केल्यावर शेवटी सोनिया गांधी मुलाखत द्यायला तयार झाल्या. 

मुलाखतीचा दिवस आणि वेळ ठरली. माझ्या समोर यक्ष प्रश्न उभा राहीला कि मुलाखत घेताना कुठले कपडे घालावेत. काही राजकीय नेत्यांच्या जुन्या मुलाखती मी बघितल्या. या उद्देशाने कि मुलाखत घेणाऱ्यांनी काय घातलं होतं ते बघुन मलाही काय घालावं ते सुचेल.  

श्रीमती गांधी मुळच्या इटालियन असल्या कारणाने मला वाटलं जर मी एखाद्या इटालियन डिझायनरचे कपडे घातले तर त्यांना ते आवडेल आणि त्या मनमोकळी मुलाखत देतील. म्हणून मी गुची-व्हरसाची-डॉलचे & गब्बाना वगैरे सुप्रसिद्ध डिझायनर्सचे वेबसाईट धुंडाळले. न्यूयॉर्क मधल्या त्यांच्या दुकानातही जाऊन आले. पण मनासारखं काही मिळेना. काही ठिकाणी हव्या त्या रंगाचे कपडे होते पण साईझ नव्हता. काही ठिकाणी हवा तो रंग होता, साईझही होता पण किंमत इतकी अव्वाच्या सव्वा होती कि काल्पनिक मुलाखती साठी एवढे महाग कपडे घेणं मनाला पटेना. 

शेवटी ठरवलं कि मुंबईत जे मिळेल ते घ्यावं. त्या दृष्टीने तिकीट काढलं आणि सामान बांधायला सुरवात केली. आणि अहो आश्चर्यम्! हँगर वरचे कपडे मागेपुढे करताना इतर कपड्यांच्या गर्दीत लपलेली माझी एक जुनी गुलाबी पँट सापडली. ती माझ्याकडे होती हे मी साफ विसरून गेले होते. उगीच सगळ्या डिझायनर्सची दुकानं फिरण्यात वेळ घालवला. 

पँटची सोय झाली. पांढरा शर्ट मुलाच्या कपाटात सापडला. त्याचा शर्ट बॅगेत भरण्या आधी त्याला विचारायला हवं की काय असा विचार मनाला चाटुन गेला. पण तो विचार मी मनातच वीरू दिला.  

ठरल्या दिवशी मुंबईत घरी पोहोचले. मुलाखतीचा दिवस जवळ येऊ लागला तशी थोडी धाकधूक वाटू लागली. न जाणो कुठुन तरी मुलाला समजलं मी त्याचा शर्ट वापरला तर तो वैतागेल. त्यापेक्षा आधीच त्याला कळवलेलं बरं असं वाटलं. त्याला मेसेज टाकला: "सगळ्या डिझायनर्सच्या दुकानात शोधलं. कुठेच मनासारखं काही मिळालं नाही म्हणून तुझा शर्ट घ्यावा लागला" असं त्याला सांगितलं. 

त्यावर त्याचं उत्तर आलं, "आये, कपड्यांची कसली काळजी करतेस. आधी प्रश्नावली तयार कर." 

मनात विखुरलेले प्रश्न नीट एकत्र जमवायला हवेत हे तेंव्हा कुठे माझ्या लक्षात आलं. मी लगेच त्या कामाला लागले. पुन्हा एकदा जुन्या मुलाखतींकडे धाव घेतली. मुलाखत घेणाऱ्यांनी काय प्रश्न विचारले होते ते बघितलं. सर्वसामान्य लोकांना सोनिया गांधींकडून काय जाणून घ्यायला आवडेल हे - कामवाली बाई कामाला आली तेंव्हा तिला विचारलं, कुरियर बरोबर बिल्डिंगचा वॉचमन वर आला तेंव्हा त्या दोघांना विचारलं. शेजारणीला, बहिणीला आणि एकदोन मैत्रिणींनाही विचारून घेतलं. बरेच प्रश्न जमा झाले. 

शेवटी मुलाला विचारलं कि त्याला सोनिया गांधीं कडून काय जाणून घ्यायला आवडेल. 

तो म्हणाला, "विचार करून सांगतो. तू दिल्लीला कधी जाणार आहेस?"

मी म्हंटल, " मी कशाला दिल्लीला जाऊ. काल्पनिक मुलाखत झूम वर आहे". 

तो म्हणाला, " मग एवढा तिकिटाचा खर्च करून मुंबईला कशाला गेलीस? काल्पनिक झूम न्यूयॉर्क मधुन नसतं करता आलं? 

... असो...होतो असा गोंधळ कधीकधी. 

मुलाखत खूप छान झाली. मी माझे प्रश्न खूप छोटे ठेवले आणि त्यांना जास्त बोलू दिलं. त्यांनीही सर्व प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली. जवळपास त्यांचा बहुमुल्य दीड ते पावणे दोन तास वेळ त्यांनी मला दिला. मी मनात असं ठरवलं होतं कि मुलाखतीच्या दरम्यान त्यांच्या नावाचा उल्लेख भारतीय पद्धतीनं सोनियाजी असा न करता इटालियन पद्धतीनं सॉन्याजी किंवा सॉन्याताई असा करायचा. पण तशी वेळ आली नाही. 

नमस्कार- चमत्काराचे सोपस्कार झाल्यावर मी सरळ प्रश्नांनाच हात घातला. 

इटालियन भाषे बरोबर माझी तोंडओळख आहे हे दाखवत म्हंटलं:  सिन्योरा, तुम्हांला आंबे खायला आवडतात का? भारतात येण्या आधी तुम्ही कधी आंबे खाल्ले होते का?   

सो. गांधी (हसून): भारतात येण्या आधी मी कधीच आंबा खाल्ला नव्हता किंवा पाहीलाही नव्हता. आंबा हे एक फळ असतं हे मला थोडंसं ऐकुन माहीत होतं. भारतात आल्यावर मी पहिल्यांदा आंबा बघितला आणि खाल्ला. आणि आता सिझन मध्ये नक्की खाते. 

प्रश्न: तुम्हांला आंबे कसे खायला आवडतात? महाराष्ट्रात आम्ही जास्त करून आमरस करून खातो किंवा फोडी चोखुन खातो. तुम्ही कसे खाता? 

सो. गांधी: आंब्याची साल काढून, त्याच्या लहान फोडी करून, त्यावर थंडगार फ्रेश क्रीम घालून ते काचेच्या नाजूक पात्रातुन खायला मला आवडतं. पण आजकाल आपण सगळे वजनाची फार काळजी करत असतो. त्यामुळे मी नेहमीच वरून क्रीम घालते असं नाही.  

प्रश्न: सिन्योरा, माझ्या घरी काम करणारी बाई कोकणी आहे. तिनं असं विचारलंय कि तुम्हांला कुठले आंबे आवडतात? 

सो. गांधी उत्तर द्यायला सुरवात करणार तेवढ्यात त्यांना थांबवत मी म्हंटलं: मला वाटतं तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीत तर बरं होईल. याचं कारण सांगते तुम्हांला - तुम्ही जर एखाद्या अमराठी म्हणजे नॉन -महाराष्ट्रीयन आंब्याचं नाव घेतलंत तर महाराष्ट्रात तुमच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागणार हे निश्चित. बऱ्याच मराठी लोकांना मनापासून असं वाटतं कि देवगड आणि रत्नागिरी हापूस सोडले तर दुसऱ्या कुठल्याही आंब्यांना बाजारात येण्याचा काही अधिकार नाही. पायरी आणि रायवळ त्यांच्या इथलेच आहेत म्हणून ते चालवून घेतात. नाहीतर पायरीला त्यांनी दारात उभं केलं नसतं. 

सो. गांधी (गालातल्या गालात हसुन) म्हणाल्या: अच्छा, अशी भानगड आहे का? मग उगीच त्या वादात पडायला नको.  

प्रश्न: आंबा पुराण मी इथे संपवते पण राजकारण हा आपल्या मुलाखतीचा मुख्य विषय नाही हे तुमच्या लक्षात आलंच असेल. एक स्त्री म्हणून तुमच्या आयुष्याचा जो प्रवास आहे त्याबद्दल जाणुन घ्यायला मला आवडेल. 

आज आंतरराष्ट्रीय विवाह खूप मोठ्या प्रमाणात होतात. लग्न करून मुली नवऱ्या बरोबर कुठल्याही देशात रहायला जातात. पण जगाच्या पाठीवर कुठेही गेल्या तरी तंत्रज्ञाना द्वारे त्या सतत दर मिनिटाला त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात राहू शकतात. 

पन्नासएक वर्षांपूर्वी आपण युरोपातुन भारतात आलात तेंव्हा भारत खऱ्या अर्थाने एक थर्ड वर्ल्ड -अविकसित देश होता. गरीब होता. जरी आपला वावर इथल्या उच्च वर्गात मर्यादित असला तरी इटलीतील तुमच्या कुटुंबाशी संपर्कात रहाणं आजच्या इतकं तेंव्हा सोप्प नव्हतं. शिवाय भारतीय संस्कृती इटालियन संस्कृती पेक्षा खुप वेगळी आहे. इटलीतुन भारतात रहायला येणं तुम्हांला कठीण गेलं का? 

सो. गांधी: ते सोप्प नव्हतं. पण माझ्या पतींची साथ होती. सासुबाईंचा आधार होता. ते दिवस खुप सुंदर होते.  

प्रश्न: राजीव गांधीं बरोबर लग्न करताना तुमचं पुढील आयुष्य कसं असेल असं तुम्हांला वाटलं होतं? भारताच्या राजकाणात एवढी महत्वाची भूमिका तुम्हांला करावी लागेल असं तेंव्हा तुमच्या स्वप्नात तरी आलं होतं का? 

सो. गांधी: नक्कीच नाही. लग्न झालं तेंव्हा माझे पती पायलट होते. ते राजकारणात सक्रिय नव्हते. सासुबाई देशाच्या पंतप्रधान होत्या. आम्ही त्यांच्या बरोबर रहात होतो. पण राजकारणाशी माझा कधी प्रत्यक्ष संबंध येईल असं तेंव्हा वाटलं नव्हतं. नेहरू कुटुंबाचा भारताच्या इतिहासात किती मोठा सहभाग राहिलेला आहे हे मी इथे आल्यावर हळुहळु उलगडत गेलं. 

प्रश्न: आपण आपल्या सासुबाईंच्या आधाराचा उल्लेख केलात. त्यांचा तुमच्यावर फार मोठ्ठा प्रभाव आहे हे दिसुन येतं. ज्या तऱ्हेनं तुम्ही साडी आणि इतर भारतीय पेहराव आपलेसे केले आहेत, ते तुम्ही त्यांच्याकडुन शिकला असावात असं वाटतं. 

तुमच्या वागण्या-बोलण्याचं वर्णन करायला मला "खानदानी" हाच शब्द योग्य वाटतो. तुमच्या वागण्यात कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, अकांडतांडव नाही. तुम्ही स्वतःच्या भावनांवर काबू ठेऊन वागताच पण लोकांच्या भावना चिथावण्याचा उद्योग कधी करीत नाही. 

खरतर या दोन्ही हत्त्यांचं भांडवल करून तुम्ही देशातील जनतेच्या भावनांना कायम आवाहन करू शकला असता. पण तुम्ही ते ही कधी केलं नाही. तुमचे पती असताना आणि ते गेल्या नंतर तुमचं वागणं  नेहमी exemplary राहिलेलं आहे. सासुबाईंबद्दल काय सांगाल? 

सो. गांधी (क्षणभर विचार करून): इंदिराजीं बद्दल काय सांगू? त्यांनी एका युद्धात देशाचं नेतृत्व केलं आणि विजय मिळवला. देश एकसंध रहावा म्हणून खालिस्तान चळवळीचा खात्मा करताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली - त्यांच्या बद्दल मी काय बोलणार?

नक्कीच, सासुबाईं कडुन मी खुप काही शिकले. त्यांना मी खुप जवळून बघितलं. आजच्या सारखी उपदेश आणि सल्ला देणारी समाज माध्यमं तेंव्हा नव्हती. जे काही शिकायचं ते आपल्या जवळच्या व्यक्तींकडुन शिकावं लागायच. माझं फार मोठं सौभाग्य कि त्या मला रोल मॉडेल म्हणून लाभल्या आणि त्यांचा सहवास मला खुप मिळाला.

प्रश्न: या ठिकाणी कुतुहुल म्हणून विचारते, तुमच्या सासुबाईंना एक भारतीय सूनही होती म्हणजे आहे. पण त्यांच्यावर इंदिराजींचा प्रभाव एवढा दिसत नाही जेवढा तुमच्या वर दिसतो. याचं कारण काय असेल असं वाटतं?

सो. गांधी: नक्की सांगू शकणार नाही. पण जर अंदाजच बांधायचा झाला तर कदाचित असं म्हणता येईल कि माझी धाकटी जाऊ भारतातच लहानाची मोठी झाली. एक भारतीय म्हणून तिचं व्यक्तिमत्व लग्ना आधीच घडलेलं होतं. मला ते सासुबाईं कडुन शिकावं लागलं.  

दुसरं म्हणजे तिचं माहेर, नातेवाईक, मित्रमैत्रिणी इथं दिल्लीतच आहे. ती हवं तेंव्हा माहेरी जाऊ शकत होती. कितीही दिवस तिथे राहु शकत होती. ते ऑप्शन मला नव्हतं. त्यामुळे मला इंदिराजींचा सहवास जास्त लाभला असावा. 

प्रश्न: मुलाखतीच्या सोयीसाठी तुमच्या भारतातील आयुष्याची दोन भागात विभागणी केली तर चालेल का? १९८४ च्या आधीचा काळ आणि त्या नंतरचा काळ. कारण १९८४ नंतर तुमचं आयुष्य पूर्णपणे पालटलं.   

सो गांधी: हो. चालेल. 

प्रश्न: १९८४ मध्ये तुमच्या सासुबाईंची हत्या झाली. १९९१ मध्ये तुमच्या पतींची हत्या झाली. तुमचे धाकटे दीर आधीच विमान अपघातात गेले होते. पती गेल्या नंतर तुमच्यावर एक वेळ अशी आली कि कुटुंबातील तुमचे सगळे जवळचे लोक गेले होते. 

तुम्ही अशा देशात एकट्या होता ज्या देशाला तुम्ही फारतर वीसएक वर्ष ओळखत होता. मुलं तशी लहान होती. राहुल एकवीस वर्षांचे होते. प्रियांका एकोणीस वर्षांची. तुम्ही पूर्ण परदेशी, तुमची मुलं अर्धी परदेशी. 

पती गेल्या नंतर सुरवातीच्या काही दिवसात काय मानसिक स्थिती होती? आपण खूप एकटे आहोत. आपल्या भोवती जे लोक आहेत त्यातल्या कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर नाही अशी भीती कधी वाटली का? 

सो. गांधी: राजीवजी गेल्या नंतर सुरवातीचे दिवस नक्कीच खूप कठीण होते. त्यातुन मी कशी बाहेर पडले ते आत्ता सांगत बसले तर इतर प्रश्नांना वेळ उरणार नाही. 

पण खंबीरपणा मी माझ्या सासुबाईं कडुन शिकले होते. त्यांनी न डगमगता देशावरील संकटांना कसं तोंड दिल ते मी बघितलं होतं. खाजगी आयुष्यात आलेल्या संकटांचा सामना कसा करायचा याचं ट्रेनिंग मला त्यातुन मिळालं होतं असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. 

प्रश्न: मी कल्पनाही करू शकत नाही कि राजीव गांधी गेल्या नंतर तुम्हांला आणि तुमच्या मुलांना कुठल्या दिव्यातुन जावं लागलं असेल. 

वयाच्या अवघ्या पंचेचाळिसाव्या वर्षी तुम्ही आपला जीवनसाथी गमावला ज्याच्यासाठी तुम्ही त्याच्या देशात आला होता. इतकंच नाही तर अचानक तुम्ही भारतातील राजकारणाच्या भोवऱ्यात ओढले गेलात. 

आजही देशाच्या राजकारणात महिलांचा सहभाग कमी आहे. तीस वर्षांपूर्वी तो आजच्याहुन कमी होता. तुमच्या भोवती जास्त करून सगळे भारतीय पुरुष. एक परदेशी तरुण स्त्री म्हणून तुमच्या बद्दल त्यांचा दृष्टिकोन, इंदिराजींकडे बघण्याच्या त्यांच्या दृष्टीकोना पेक्षा वेगळा असणार. 

देशासाठी काम करताना तुमच्या सासुबाईंनी आणि पतींनी आपले प्राण गमावले. त्यानंतर तुम्हांला आणि तुमच्या मुलांना खूप कठीण काळातुन जावं लागलं. तुम्हांला असं वाटतं का कि त्याबद्द्दल देशातील जनतेकडुन तुम्हांला मिळायला हवी होती तितकी सहानभूती कधी मिळाली? का तुमचं परदेशी असणं त्याच्या आड आलं? 

सो. गांधी: या प्रश्नाचं उत्तर भारताच्या जनतेनं स्वतःला विचारायचं आहे. मी नाही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार. 

प्रश्न: आज काळ खुप बदलला आहे. ग्रेट ब्रिटनच्या पंतप्रधानपदी एक भारतीय वंशाची व्यक्ती आहे. कित्येक भारतीयांनी त्या घटने नंतर आपली छाती अभिमानाने फुगवली आहे. आज कोणी असं म्हणत नाही कि ब्रिटन मध्ये आता रामराज्य येणार. 

तुमच्या वेळी मात्र तुमचे पती गेल्यानंतर तुमच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली कि आता भारतात रोमराज्य येणार. ती टीका केवळ तुम्ही महिला असल्यामुळे झाली असं तुम्हांला वाटतं का? 

सो. गांधी: हो, ते ही कारण असु शकेल. 

प्रश्न: तुमच्या मुलांबद्दल विचारलं नाही तर ही मुलाखत अपूर्ण राहील म्हणून विचारते, आजच्या पिढीला कल्पना नसेल कि खालिस्तान चळवळ चालू होती तेंव्हा देशात किती असुरक्षिततेचं वातावरण होतं. देशाच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेला तेंव्हा खूप मोठा धोका होता. लोकांच्या हत्या होत होत्या, जागोजागी बॉंब स्फोट आणि अतिरेकी हल्ले होत होते. तुम्हांला आणि तुमच्या मुलांना बाहेरच्या जगात मोकळेपणानी वावरता येत नव्हतं. सतत सुरक्षा कवचाच्या आत रहावं लागलं. तुमच्या मुलांचं बालपण या दोन विघटनवादी चळवळींनी हिरावुन घेतलं असं म्हंटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. 

मी जेंव्हा तुमच्या मुलांबद्दल विचार करते तेंव्हा मला नेहमी असा प्रश्न पडतो कि त्यांना कोवळ्या वयात इतका ट्रॉमा सहन करावा लागला आहे कि ते सकाळी बिछान्यातुन उठु तरी कसे शकतात. याचं मला फार आश्चर्य वाटतं. वयाच्या आठ वर्ष ते एकवीस वर्ष या काळात त्यांनी त्यांच्या जवळच्या तीन मुख्य व्यक्तींचे मृत्यू बघितले. ते मृत्यु आकस्मिक तर होतेच शिवाय त्यांची आज्जी, काका आणि वडील यांचे देह छिन्नविछिन्न करणारे होते. 

अमेरिके मध्ये  PTSD (post traumatic stress disorder) या मानसिक आजराबद्दल बरंच बोललं जातं. अमेरिकन सैनिक जेंव्हा परदेशातील युद्धावरून घरी परत येतात तेंव्हा युद्धात बघितलेल्या हानीचा आणि विध्वंसाचा त्यांच्या मनावर आणि कधीकधी शरीरावर देखील इतका खोल परिणाम झालेला असतो की त्या धक्क्यातून बाहेर पडायला त्यांना खूप वेळ लागतो किंवा काही जण कधीच त्यातुन बाहेर पडु शकत नाहीत. 

पण PTSD फक्त सैनिकां मध्येच आढळते असं नाही. एखादी व्यक्ती खूप ट्रॉमा मधून गेली तर तिला ते होऊ शकतं. काही महिलांना प्रसूती नंतरही PTSD होतं असं म्हणतात. 

तुमच्या मुलांना त्यांच्या जडणघडणीच्या वयात ज्या ट्रॉमातुन जावं लागलं त्याची तीव्रता इतकी जास्त होती कि त्यामुळे त्यांच्यावर मानसिक आघात झाला आहे असं तुम्हांला वाटतं का? आणि तो किती खोल होता? 

सो. गांधी: निःसंशय काही प्रमाणात परिणाम तर झालाच असणार. कारण ते आघात इतके मोठे होते. 

पण मला वाटतं कि आजार शारिरीक असो किंवा मानसिक, तो सहन करण्याची आणि त्यावर मात करण्याची एखाद्या व्यक्तीची क्षमता निरनिराळ्या गोष्टींवर अवलंबुन असते. कौटुंबिक पार्श्वभूमीचाही त्यात मोठा वाटा असतो असं मला वाटतं.  

माझ्या मुलांच्या बाबतीत बोलायचं तर त्यांच्या चार पिढयांनी आपलं आयुष्य देशाच्या कामासाठी वाहिलेलं आहे. त्यासाठी आयुष्यात अनेक चढउतार सहन केले आहेत. त्यांच्या पूर्वजांनी देशाला आपलं कुटुंब मानलं आहे. त्या वारश्यातुन माझ्या मुलांना जी अंतर्गत ताकद मिळाली आहे ती मी कमी लेखणार नाही. त्यांचे पणजोबा, आज्जी आणि वडीलांनी देशाचं नेतृत्व केलं आहे. तो वारसा त्यांना त्यांच्या रक्तातुन मिळाला आहे. 

लहान वयात "नॉर्मल"आयुष्य जगता न आल्यामुळे त्यांना त्यांचं स्वतःच असं व्यक्तिमत्व घडवायला थोडा वेळ लागला असेल कदाचित. पण काळ हे सर्वोत्तम औषध आहे असं म्हणतात. जसं त्या घटनां पासुन आपण लांब जात आहोत तसं माझी मुलं त्यातुन सावरत आहेत असं मला वाटतं. 

प्रश्न: शेवटचे दोनएक प्रश्न विचारण्या आधी मला तुमचं अभिनंदन करावसं वाटतं कि गांधी -नेहरू घराण्याची सून असण्याचं ओझं तुम्ही एक परदेशी स्त्री असुनही खूप समर्थपणे निभावलंत. तुमच्या धाकट्या जाऊबाईंना भारतीय असुनही ते नीटसं जमलेलं दिसत नाही. त्यांच्यावर टीका करण्याचा माझा हेतु नाही. हे फक्त एक निरीक्षण आहे. 

काही वर्षांपूर्वी असं वाचलं होतं कि त्यांनी मुक्या प्राण्यांच संरक्षण करण्याच्या कामाला स्वतःला वाहुन घेतलं आहे. ते निश्चितच चांगलं काम आहे. पण मध्यंतरी कुठेतरी असं ऐकल कि दिल्लीत बेवारशी कुत्र्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढली आहे. त्याचा त्रास आता रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांनां होत आहे. इतका त्रास होतोय कि महिला रात्रीच्या वेळी घराबाहेर पडायला घाबरू लागल्या आहेत. 

मी काही तुम्हांला असं म्हणंत नाही कि तुमच्या जाऊबाईंमुळे तो त्रास वाढला. सहज आपलं तुमच्या कानावर घालून ठेवलं. 

खरंच तुमचं अभिनंदन कि तुम्ही एक आदर्श सून, पत्नी आणि आई होऊ शकलात. 

सो. गांधी : धन्यवाद. 

प्रश्न:  जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मला जे प्रश्न विचारावेसे वाटत होते ते विचारण्याची संधी दिल्या बद्दल मी आपली खूप आभारी आहे. राजकारणा विषयी प्रश्न विचारायचा नाही असं मी ठरवलं होतं. पण स्वतःहुन तुम्हांला काही सांगायचं आहे का? देशातील सध्याच्या राजकीय परिस्थिती बद्दल किंवा भारत जोडो यात्रे बद्दल? 

सो. गांधी: नाही, मला त्यावर काही भाष्य करायचं नाही. जे काही चाललंय ते सगळं भारतातील जनतेच्या समोर आहे. जनतेने डोळे उघडे ठेऊन ते बघावं एवढंच मी म्हणेन. 

प्रश्न: तुमचे स्वतः बद्दल काही प्लॅन आहेत का जे तुम्ही लोकांना सांगू शकाल. म्हणजे निवृत्त व्हावंसं वाटतं कि नाही वाटत?  कुठे निवृत्त व्हायला आवडेल - इटली मध्ये, भारतात गोव्यासारख्या ठिकाणी किंवा दिल्लीत मुलांच्या जवळ? 

सो. गांधी: अजून ते काहीच मी ठरविलेलं नाही. 

प्रश्न: मुलाखतीच्या शेवटी मी आपल्याला विनंती करते कि आपण आत्मचरित्र लिहावं. आज काळ खुप विचित्र झाला आहे. बरेच लोक त्यांच्या वागण्यात कुठलीही मूल्य पाळत नाहीत असं दिसुन येतं. त्यामुळे लहान मुलं अतिशय चुकीचे आदर्श बघत वाढत आहेत. 

तुमच्या सारख्या पारंपारिक जीवन मूल्य जपलेल्या स्त्रीनं पुढील पिढ्यांना स्वतःचे अनुभव सांगण्याची गरज आहे. लिहाल का? 

सो. गांधी: बधु. 



तळटीप : काल्पनिक मुलाखत कल्पने पेक्षा जास्त लांबल्या मुळे काही प्रश्नोत्तरांचा समावेष या ठिकाणी होऊ शकला नाही. 






Sunday, January 22, 2023

कत्रीनांच्या करवा चौथची कैफियत


कत्रीना कुणी एक व्यक्ती नाही. ती खरी आहे पण प्रातिनिधिक आहे. अनेक व्यक्तींचं मिश्रण आहे. 

कत्रीना तिच्या शॉर्ट्स किंवा रिल्स मधुन नियमित समोर येते. काही लाख दर्शक तिचे शॉर्ट्स पहातात. एकदा कधीतरी समोर आलेली तिची क्लिप चुकून बघितली, तेंव्हा पासुन ती माझ्या यूट्यूबच्या पानावर येत रहाते. मी गंमत म्हणून - "कत्रीनानी आज काय आचरटपणा लावलाय बघूया" म्हणून तिचे शॉर्ट्स बघते. 

तिच्या एकूण दर्शकां पैकी किमान काही लोक तरी त्याच कारणास्तव बघत असावेत. जरी ते कौतुक आणि प्रोत्साहनाचा वर्षाव करीत असले तरी. दर्शक तिचे शॉर्ट्स का बघतात याच्याशी कत्रीनाला काही देणंघेणं दिसत नाही. ते बघतात एवढंच तिला हवं आहे. 

तिचे शॉर्ट्स बघून मी फार गोंधळात पडते. कत्रीना मला धक्क्यांवर धक्के देते. ती काय चीज आहे ते मला समजेनासं झालं आहे. तिच्या एखाद मिनिटाच्या किंवा काही क्षणांच्या व्हिडीओ क्लिप मध्ये जे दिसतं त्या व्यतिरिक्त मला तिच्या बद्दल काही माहीती नाही. तिचं वय एकूणचाळीस आहे असं ती एका व्हिडिओत म्हणाली होती. ती अमेरिका किंवा कॅनडा या पैकी एका प्रगत देशात रहाते. 

तिला चार मुलं आहेत. म्हणजे होती. काही दिवसांपूर्वी तिनं एक शॉर्ट्स लावलं. त्यात तिनं आपल्या चार मुलांच्या हातात चार ept (early pregnancy test) च्या टुयब देऊन त्यांना त्यांच्या वडिलांकडे पाठवलं. बॅक्ग्राउंडला कत्रीना खूप खुशीत हर्षवायू झाल्या सारखी हसत म्हणत होती, "पाचव्या प्रेग्नन्सीची बातमी देऊन मी माझ्या नवऱ्याला आश्चर्यचकीत करीत आहे". तिच्या शॉर्ट्सचं शिर्षकही तेच होतं. 

तो पहिला धक्का होता. मी शाळाकॉलेजात असताना माझ्या आजूबाजूच्या समाजात एक किंवा दोन पेक्षा जास्त मुलं होणं हे अडाणी आणि अशिक्षित माणसांचं लक्षण मानलं जायचं. जगाची लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढली आहे त्यामुळे पृथ्वी वरचा समतोल ढासळतोय आणि तिचं अस्तित्व धोक्यात आलं आहे असं आमच्या मनावर बिंबवलं गेलं होतं. 

पिल्लावळ कुत्र्यामांजरांना होते. मनुष्य प्राण्यांनी जनन प्रक्रियेवर नियंत्रण प्राप्त केलेलं आहे असा आमचा समज करून देण्यात आला होता. माझ्या माहितीत माझ्या पिढीतील कोणालाही दोन पेक्षा जास्त मुलं नाहीत. बऱ्याच जणांना एकच आहे. 

पाचव्या मुलाच्या आगमनाची बातमी ऐकल्यावर कत्रीनाच्या नवऱ्यानी घेतलेला खोल श्वास आणि त्याचा पडलेला चेहरा कॅमेऱ्याच्या नजरेतुन सुटला नाही. कत्रीनाच्या ते लक्षात आलं असावं. "तो ही बातमी प्रॉसेस करतोय" ती कॅमेऱ्याच्या पाठीमागुन म्हणली.   

तिला अमेरिकेतील एका नावाजलेल्या लॉ कॉलेजात प्रवेश मिळाला होता पण तिनं तो घेतला नाही असं कत्रीनाने एका शॉर्ट्स मध्ये सांगितलं. वर प्रेक्षकांना विचारलं, "कठीण असतं का त्या कॉलेजात प्रवेश मिळणं?" 

तेंव्हा पासुन तिचे शॉर्ट्स मी त्या चष्म्यातुन बघु लागले. 

असं वाटू लागलं कि जणू ती स्वतःला, तिच्या दर्शकांना आणि तिच्या समकालीन महिलांना (ज्यांनी उच्च शिक्षण पूर्ण करून आपल्या करिअर वर लक्ष केंद्रित केलं...त्यासाठी त्यांना लग्न आणि मुलं दोन्हीच्या बाबतीत थोडं कॉम्प्रमाईज करावं लागलं) दाखवू पहात आहे की, " जरी मी कायद्याच्या पदवीवर पाणी सोडलं असलं तरी बघाबघा मी कसं घरकाम आणि कुटुंबाला वाहुन घेतलं आहे. शिवाय शॉर्ट्स मध्ये करिअरही करतेय." 

"मला डॉक्टर नवरा मिळाला आहे. तो माझ्या सारखाच गोंडस देखणा आहे. आम्हांला पाच मुलं आहेत. आम्ही दोघेही खूप हुशार आणि अभ्यासु आहोत. आमची मुलंही अभ्यासु आहेत ... आणि हे सगळं मिळविण्यासाठी ना मला लॉ कॉलेजात जावं लागलं ना लग्नाच्या बाबतीत काही तडजोड करावी लागली. सगळं कसं खूप सहज सुंदर घडतंय माझ्या आयुष्यात!" (एका शॉर्ट्स मध्ये तिचा नवरा आणि चार मुलं बुद्धिबळ सारखे बौद्धिक खेळ खेळत आणि वाचत बसलेली दिसतात. कॅमेरा त्यांच्यावरून फिरवत कत्रीना म्हणते, "कॉलेज मधल्या अभ्यासु मुलाशी तुम्ही जरा चांगलं काय वागता ... हे असं होतं!")

आपण पाचव्या मुलाला जन्म देत आहोत म्हणजे फार मोठा पराक्रम करत आहोत या थाटात कत्रीनाने पुढील महिने घालवले. वारंवार आपल्या पोटाच्या आकाराचा अपडेट दर्शकांना देत राहीली.  

पहिल्या तीमहीत म्हणाली, - "बघाबघा माझं पोट! मी सध्या तीन महिन्यांची गरोदर आहे. समोरून नीट दिसत नाही का? थांबा साईडनी दाखवते." 

दुसऱ्या तीमहीत म्हणाली - "बघाबघा माझं पोट! आता सहावा महिना आहे. मी पोटावर फिट बसणारा टी शर्ट घालते आणि साईडनी दाखवते म्हणजे माझं पोट किती मोठं झालंय ते तुम्हांला नीट दिसेल. 

तिसरी तीमही - पुन्हा तेच. पोट किती मोठं झालंय ते लोकांना दाखवण्याची धडपड. 

ती पोटाचं इतकं कौतुक करत होती कि मला वाटलं कंटाळून कोणतरी बघणारी तिला विचारेल, "मुलाला जन्म दिला म्हणजे एव्हरेस्ट शिखर सर केलं असं वाटतं का तुला?'  

अशी कॉमेंट जर कुणी लिहिली तर मला खात्री आहे कि कत्रीना बाजूला राहील आणि तिचे चाहते त्या व्यक्तीवर तुटुन पडतील. म्हणतील, "डोकं फिरलयं का तुझं? मुल जन्माला घालण्याच्या प्रक्रियेची तुलना तू एक टेकडी चढण्याशी करतेस?"      

                                                                             ***                                         

पहिली कत्रीना आपलं वाढलेलं पोट दर्शकांना नीट दिसावं म्हणून धडपडत होती तेवढ्यात दुसऱ्या कत्रीनाने बाजी मारली. तिनं चक्क आपलं बा-ळं-त-प-ण-च लोकांना दाखवलं. प्रत्यक्ष मुलाचा जन्म होताना दाखवलं. इतके खाजगी क्षण मलाच पडद्यावर बघवले नाहीत. 

कत्रीना(१) आणि कत्रीना(२) अनुक्रमे त्यांच्या गरोदरपणाचा आणि बाळंतपणाचा आनंद दर्शकांबरोबर वाटुन घेत होत्या तेंव्हा कत्रीना(३) बिच्चारी आपल्या गाडीत बसुन रडत होती. ते सुख यापुढे तिच्या नशिबात येणार नव्हतं. त्याबद्दल नवरा तिचं सांत्वन करत होता. कॅमेरा त्याच्याच हातात असावा. 

कत्रीना(३)ला डॉक्टरांनी सांगितलं होतं कि तिला चवथं मुल होऊ शकणार नाही. आहेत त्या तीन वरच थांबावं लागेल. म्हणून ती अश्रु ढाळत होती. 

जगात अनेक महीला आपल्याला एकतरी मुल व्हावं म्हणून तळमळत असताना ही तीन मुलांची आई का रडते आहे (आणि लोकांनां ते दाखवते आहे) मला समजेना. मी मनातल्या मनातं तिच्या रडण्यामागचं कारण शोधू लागले:

कारण अ - आहेत ती तीन मुलं आपल्याला मातृत्वाचं सुख देण्यात कमी पडत आहेत असं तिला वाटत होतं म्हणून चवथ होऊ शकणार नाही याबद्दल ती दुःखी होती?

ब - आपल्याला आणखी मुलं होऊ शकली नाहीत याचा अर्थ आपलं स्त्रीत्व संपुष्टात आलं आणि पत्नी म्हणून आपण कमी पडलो असं तिला वाटत होतं म्हणून रडत होती? 

क  - माझ्या सख्ख्या मैत्रिणीला/ बहिणीला/ शेजारणीला किंवा दुसऱ्या कोणाला तरी पाचसहासात मुलं आहेत आणि मला मात्र तीन वरच थांबावं लागतंय याचं दुःख होतं? 

कत्रीना(३) गाडीत बसुन रडत होती. गाडी कुठल्यातरी पार्किंग लॉट मध्ये उभी होती. ती डॉक्टरांच्या ऑफिस मधुन बाहेर आली आणि लगेच दर्शकांना हि बातमी सांगण्यासाठी तिनं शॉर्ट्स बनवायला सुरवात केली तेंव्हा तिला रडू कोसळलं कि ती रडत असताना ते लोकांना दाखवावं म्हणून तिनं कॅमेरा सुरु केला हे कळायला मार्ग नव्हता. 

या सर्व जन्मदात्रींना खरोखरच मोठ्या कुटुंबाची हौस असेलही कदाचित. किती मुलांना जन्म द्यावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे (?). पण ज्या लोकांना असं वाटतं की मुलं नसली तरी किंवा एकदोन असली तरी बऱ्यापैकी परिपूर्ण आयुष्य जगता येतं आणि जितकी जास्त मुलं होतील तितकं त्यांच्याकडे लक्ष पुरवणं कठीण जाईल  - त्यांना एवढी मुलं होण्यामागे वेगळीच कारणं दिसतात:

दहाएक वर्षांपूर्वी अमेरिका आणि इंग्लड मध्ये टीव्ही मालिका येऊन गेल्या ज्यात खुप मुलं असलेल्या खऱ्याखुऱ्या कुटुंबाच्या दैनंदिन आयुष्याचं चित्रीण दाखवण्यात आलं. त्या मालिकांची शिर्षकं फिफ्टीन अँड काउंटिंग, ट्वेंटी अँड काउंटिंग म्हणजे पंधरावीस मुलं आहेत आणि अजुन होतातच आहेत अशी होती. त्या मालिका बघत मोठं झालेल्या पिढीवर त्याचा परिणाम झालेला असण्याची शक्यता आहे. 

कत्रीना (१) गळ्यातील साखळी मध्ये तिच्या धर्माचं चिन्ह असलेलं लॉकेट ठळकपणे दिसेल असं घालते. मोठं कुटुंब हा तिच्या धार्मिकतेचा भाग आहे असं ते बघणाऱ्याला वाटु शकतं. 

वर्षानुवर्षे टीव्ही वरील मालिकांनी ही क्लुप्ती वापरलेली आहे. सुरवातीला लोकप्रिय असलेल्या मालिकेचं कथानक काही दिवसांनी थंडावलं, दर्शकांची संख्या रोडावली, लेखकांना नविन विषय सुचेनासे झाले कि नविन बाळाचं कथानक मालिकेत घातलं जातं. हमखास दर्शकांची संख्या वाढते. 

कत्रीना(१) ला पाच मुलं झाली... मुलांची संख्या वाढल्यावर ते नविन घरात रहायला गेले... ते सगळं तिनं तिच्या शॉर्ट्स मध्ये दाखवलं. त्याबरोबर तिला बघणाऱ्यांची संख्या वाढली. ते बघुन इतर कत्रीनांना आपल्या दर्शकांची संख्या वाढावी असं वाटु शकतं.    

कत्रीनांच्या शॉर्ट्स किंवा रिळांमध्ये - मी, माझी मुलं, माझा नवरा, माझा स्वयंपाक या शिवाय दुसरं काही नसतं. एखाद्या कुटुंबाचा तोच तो दिनक्रम बघुन दर्शक काही दिवसांनी कंटाळतात. आपल्या मुलांबरोबर केलेल्या बालिश कलाकृती आणि पाककृती (फळांपासुन कँडी बनवा... पुडिंग मध्ये टॉफी घाला) आयांना कितीही क्यूट वाटल्या तरी बाहेरचे लोक ते किती काळ बघू शकतात याला मर्यादा असते. बदल म्हणून दुसऱ्या कोणाची तरी रिळं त्यांना खुणावू लागतात. अशा वेळी कत्रीनाच्या घरात पुनश्च पाळणा हलणार आहे असं समजलं कि दर्शक हमखास नव्या उत्साहाने तीची रिळं किंवा शॉर्ट्स बघू लागतात. किमान पुढील काही काळ तरी त्यांचं लक्ष त्यात गुंतलेलं राहु शकतं...  

                                                                            *** 

कत्रीना(१) चं पाचवं गरोदरपण स्वतःवर खुष होण्यात पुढे सरकत होतं त्या सुमारास भारतातील कत्रीना कुठल्यातरी सिनेमातील एक दोन गाण्यांच्या मुखड्यांवर नाचत होत्या. आई -सासु बरोबर, मित्रमैत्रिणीं सोबत, नवऱ्या बरोबर असं कोणा बरोबरही त्याच त्या मुखड्यांवर नाचत होत्या. मला परत धक्का बसला.  

पूर्वी घुमा म्हणून एक होती. तिला तिच्या मैत्रिणी मंगळागौरीच्या दिवशी नाचायला सांगायच्या. 

त्या म्हणायच्या, "नाच गं घुमा". 

घुमा म्हणायची, "नाही गं मैत्रिणींनो, या गावचा त्या गावचा माळी नाही आला. वेणी नाही मला. मी कशी नाचू. "

तरी मैत्रिणी आग्रह धरायच्या. म्हणायच्या, "नाच ग घुमा. तू नाचायलाच हवं " 

त्यावर घुमा म्हणायची, " नाही गं मैत्रिणींनो, या गावचा त्या गावचा कासार नाही आला. बांगड्या  नाही मला. मी कशी नाचू".  

घुमा खूप कारण सांगायची. आढेवेढे घ्यायची. घराच्या दिवाणखान्यात किंवा गच्चीवर मैत्रिणीं सोबत नाचायचं असलं तरी ती एका पायावर तयार होत नसे. 

कत्रीना मात्र इमारतीच्या पार्किंग मध्ये लावलेल्या गाड्यांच्या पार्श्वभूमीवर नाचल्या, बागेत,  रस्त्यात असं कुठंकुठं नाचल्या. त्यांच्या नाचाचं रूपही वेगळं आहे. पूर्वीच्या नाचात ना पासुन सुरु होणारा नाजूकपणा असायचा. आता उड्या मारणे आणि आपला पाठीमागचा भाग कॅमेऱ्याला दाखवून हलवणे याला नाच म्हणतात. 

                                                                                        ****

एकावर एक शॉक बसत असल्याने ते ऍबझॉर्ब करायची सवय लागली. मग करवा चौथ आली. कत्रीनांनी ती बॉलिवूड स्टाईल मध्ये साजरी केली. तेंव्हा काही वर्षांपूर्वी वाचलेला एक लेख आठवला. न्यूयॉर्कच्या वर्तमानपत्रात आला होता. लिहिणारीचं नाव आठवत नाही. 

तिनं जो मुद्दा मांडला होता त्याचा मला उमजलेला अर्थ असा: जुन्या हिंदी सिनेमां मध्ये खलनायिका हे एक पात्र असायचं. खलनायिका पडद्यावर ते सर्व करायची जे तेंव्हाच्या नायिका करत नसंत. ती पाश्चिमात्य कपडे घालायची. क्लब मध्ये कॅब्रे डान्स करायची. त्या काळानुरूप थोडंफार शरीर प्रदर्शन करायची. तेंव्हाच्या नायिका अंग झाकणारे भारतीय कपडे घालायच्या आणि सोज्वळ वागायच्या. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाकडे आकर्षित करण्याचं काम खलनायिकेचं असायचं. 

सिनेमा जसा बदलत गेला तसं जे एकेकाळी खलनायिका करायची ते नायिका करू लागल्या. त्या पडद्यावर बिकिनी घालू लागल्या. खूप तोकडा ब्लाऊज आणि कमरेच्या खूप खाली साडी नेसुन शरीर प्रदर्शन करीत उत्तान, सिडक्टिव्ह नृत्य करू लागल्या*. त्यामुळे चित्रपटात खलनायिकेची गरज भासेनाशी झाली. तिची भूमिका हळुहळु कमी होत गेली. आणि सध्याच्या हिंदी सिनेमातुन खलनायिका हे पात्र नाहीसं झालं आहे. 

आजच्या हिंदी सिनेमातील नायिका हि जुन्या सिनेमातील खलनायिका + नायिका यांची बेरीज आहे. त्या शरीर प्रदर्शन करत उत्तान नृत्य करून प्रेक्षकांना आकर्षित करण्याचं काम करतात. तसंच त्या करवा चौथचा उपासही करतात. बॉलीवूडला आदर्श मानणारी मंडळी त्यांचं अनुकरण करतात. 





* टॉपच्या नायिकाही शरीर प्रदर्शन टाळू शकत नाहीत असं दिसून येतं: माधुरीचं कायम एका विशष्ट प्रकारे साडीचा पदर किंवा ओढणी घेणं किंवा ऐश्वर्याचा कजरा रे या गाण्यावरील नाच. भरपूर शरीर प्रदर्शन करत तिनं आपला नवरा आणि सासऱ्यांच्या बरोबर पडद्यावर तो उत्तान नाच केला आहे. भारतातील कोट्यावधी घरांमध्ये कुटुंबातील लहानमोठ्यांनी एकत्र बसुन तो टीव्ही वर बघितला असणार. कोणालाच आता त्यात काही विशेष वाटत नाही. इतकी आता आपल्याला त्याची सवय झाली आहे.